"विवेकानंद संस्थेच्या देव्हा-यातील समई संस्थामाता सुशीलादेवी साळुखे"
प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड
आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, नागठाणे
(मो. - 8208835510)
“आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं !"
'आई' या शब्दातच आकाशाची विशालता आणि ईश्वराची महानता सामावलेली आहे. आपल्या पोटच्या लेकरांचा सांभाळ करणारी आई ही जर इतकी महान असेल तर समाजातल्या गोरगरीब, दीनदुबळ्या, उपेक्षित-दलित अशा साऱ्या लेकरांना आपल्या पोटाशी घेऊन त्यांच्यावर मातृत्वाचा वर्षाव करणारी 'ती' आई केवढी महान असेल ? नक्कीच आकाशापेक्षाही विशाल आणि ईश्वराइतकीच महान असेल !
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नावाच्या गजबजलेल्या घरामध्ये साऱ्यांना आपल्या मातृत्वाची सावली देणारी माऊली म्हणजे संस्थामाता सुशीलादेवी साळुखे ! शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुखे यांच्याशी विवाह झाल्यापासून बापूजींसोबत सावलीसारख्या राहिलेल्या सुशीलादेवी बापूजींच्या निर्वाणानंतर साऱ्या संस्थेची आणि गुरूदेव, कार्यकर्ते, विद्यार्थी यांची सावली बनून राहिल्या.
सुशीलादेवींचा जन्म ४ सप्टेंबर १९२७ रोजी बेळगाव येथे दत्ताजीराव नानासाहेब चव्हाण पाटील यांच्या सधन शेतकरी कुटुंबात झाला. मातृछत्र लहानपणीच हरवले. छोट्या सुशीलाचा सांभाळ आजी कृष्णाबाई यांनी केला. आजीमुळे सुशीलादेवींना अध्यात्माचे बाळकडू मिळाले. लहानपणी त्या खेळकर होत्या. तशाच त्या कष्टाळूही होत्या. शेतातील सर्व कामे त्या कुशलतेने करायच्या.
गोविंद ज्ञानोजीराव साळुखे म्हणजेच बापूजी साळुखे यांच्याशी त्यांचा विवाह १५ डिसेंबर १९४० साली झाला आणि सुशीलादेवींच्या आयुष्यातील एका तेजस्वी पर्वाची सुरूवात झाली. विवाहानंतर थोड्याच काळात बापूजी साळुंखे सोंडूर संस्थानामध्ये दाखल झाले. बापूजींचे गुरू व इतिहासाचे नामवंत प्राध्यापक आप्पासाहेब पवार यांना सोंडूरच्या घोरपडे घराण्याचा इतिहास लिहायचा होता. याठिकाणी बापूजी आणि सुशीलादेवी राजघराण्याच्या सहवासात ऐश्वर्यात राहिल्या. तिथल्या राणीसाहेबांसोबत सुशीलादेवींची मैत्री झाली.
पण बापूजी हे एक ध्येयवादी व्यक्तिमत्त्व होते. ऐश्वर्यात लोळत राहणे त्यांच्यातील देशभक्त, कार्यकर्त्याला सहन होणे शक्य नव्हते, म्हणून महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनात आणि १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उडी घेतली आणि सोंडूरचे राजवैभव सोडून भूमिगत चळवळीत सहभाग घेतला.
पडवळवाडी (ता.वाळवा) सारख्या लहान खेड्यात अत्यंत हालअपेष्टांचे आणि कष्टाचे जीवन त्यांनी जगायला सुरूवात केली. जेवढ्या आनंदाने सुशीलादेवींनी बापूजींना राजवैभवात साथ दिली त्याच आनंदाने त्यांनी भूमिगत चळवळीच्या कष्टप्रद, आव्हानात्मक जगण्यातही साथ दिली.
या काळात बापूजींनी स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत चळवळीत सहभाग घेतला. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणाचा मोह सोडून त्यांनी शिक्षणप्रसाराचा, खडतर समाजसेवेचा मार्ग स्वीकारला आणि रयत शिक्षण संस्थेतील नोकरीचा त्याग करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली. यावेळेपर्यंत बापूजी आणि सुशीलादेवी यांच्या संसारवेलीवर अरूणा, अभयकुमार, सुधा, शरद, दीपक आणि विद्या ही गोंडस आणि गोड फळे लगडली होती. एका बाजूला बापूजींचे ध्येयवादी खडतर व्यक्तिमत्त्व आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच समरसतेने त्यांना साथ देणाऱ्या सुशीलादेवी त्यामुळे संसार गरिबीचा असला तरी सात्विकतेचा होता आनंदाचा होता.
डॉ.बापूजी साळुखे जसे ध्येयवादी कार्यकर्ते होते, तसेच ते प्रापंचिक सद्गृहस्थ होते. श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा पसारा ज्यावेळी बापूजी मांडीत होते त्याच वेळी त्यांच्या धर्मपत्नी सुशीलादेवी कोंड्याचा मांडा करून संसार चालवित होत्या आणि बापूजींना अंगीकृत कार्यासाठी बळ देत होत्या. बापूजींनी मुलांसाठी बोर्डीग सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रातून गोरगरीब, दलित, अनाथ मुले त्या बोडींगमध्ये दाखल झाली. त्या मुलांसाठी सुशीलादेवी आई झाल्या. आपल्या मुलांइतकीच माया, प्रेम त्यांनी या मुलांनाही दिले. त्यांची दुखणी, आजारपण काढली, सणादिवशी गोडधोड खायला दिले. आणि आपल्या मातृत्वाला आकाशाएवढे विशाल केले.
सुशीलादेवी कधी संस्थेच्या कार्यालयात आल्या नाहीत की संस्थेच्या कामकाजात सहभाग घेतला नाही. संस्थामातांच्या या त्यागाप्रती आणि निस्वार्थी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व गुरूदेव कार्यकर्त्यांनी एकमुखाने आणि एकमताने २७ मे २०१२ रोजी संस्थामातांची निवड संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी केली. तरीही त्या पदाधिकारी म्हणून संस्थेत कधीच आल्या नाहीत. परंतु, संस्था सुरळीत चालावी, तिचा नावलौकिक वाढावा यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील राहिल्या.
बापूजींच्या आणि संस्थामातांच्या सावलीत वाढलेले संस्थेचे अनेक विद्यार्थी पुढे संस्थेत गुरूदेव कार्यकर्ते झाले, अनेक संस्थेत पदाधिकारी झाले. ते केवळ संस्थामाता सुशीलादेवींच्या प्रेमाने आणि प्रेरणेने ! या विद्यार्थ्यांना त्या नेहमी संस्थेचा विचार करायला आणि बापूजींच्या ध्येयवादावर विश्वास ठेऊन वाटचाल करायला सांगत; आणि प्रवृत्त करीत.
बापूजींनी सुशीलादेवींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “पतीच्या मार्गातील काटे पत्नीने काढून त्याचा मार्ग सुखकर करून देणे हे पत्नीचे कर्तव्य असते, म्हणूनच मोठमोठ्या साध्वी स्त्रियांनी ज्या ज्या वेळी आपल्या पतीवर अडचणी येतील त्या त्या वेळी त्यांनी आपल्या प्राणत्यागाची देखील झीज सोसून आपल्या पतीचे जीवन सुखी केले." बापूजींच्या या वचनाप्रमाणेच सुशीलादेवींनी आपले सारे जीवन समर्पित केले. आणि 'आपण नोकरीकरता आलो नसून समाजाचा संसार जोडण्याकरिता आलो आहोत.' या बापूजींच्या वाक्याला स्मरून त्यांना अखेरपर्यंत साथ दिली.
बापूजींच्या हयातीमध्ये त्या बापूजींच्या कार्याला 'साथ' देत राहिल्या आणि बापूजींच्यानंतर त्या संस्थेच्या कार्याला आपल्या 'सात्विकतेचे बळ' देत राहिल्या ! स्वत: नेहमी खडतर आयुष्य जगून समाजाचे, आपल्या विद्यार्थ्यांचे, संस्थेतील गुरूदेव कार्यकर्त्यांचे आयुष्य सुखमय करीत राहिल्या.
मंगळवार दि. २२ ऑक्टो, २०१३ हा दिवस म्हणजे संस्थेतील सर्व विद्यार्थी, गुरूदेव कार्यकर्ते आणि संस्थासेवकांसाठी मोठी दु:खद बातमी घेऊन आला. या दिवशी संस्थामाता सुशीलादेवी साळुखे यांचे देहावसान झाले. संस्था खऱ्या अर्थाने पोरकी झाली. त्यांचे जाणे संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना, गुरूदेव कार्यकर्त्यांनाच नव्हे तर साऱ्या संस्थेला पोरके करून जाणारे ठरले. त्यांच्या रूपाने 'मातृत्वाचा एक वैश्विक अविष्कार' महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला अनुभवायला मिळाला.
स्वतः कायम अंधारात राहून सभोवतालच्या साऱ्यांची आयुष्ये प्रकाशाने उजळून टाकणाऱ्या संस्थामाता सुशीलादेवी साळुखे यांचे आयुष्य समईतील ज्योतीप्रमाणेच शांत, शीतल, सात्त्विक आणि संस्थारूपी देव्हारा प्रकाशाने उजळून टाकणारे होते.
कवी फ.मु.शिंदे 'आई' कवितेत जे म्हणतात ते सुशीलादेवींच्या निर्वाणानंतर आपण खऱ्या अर्थाने अनुभवले...
'आई असते एक धागा
वातीला उजेड दावणारी
समईतली जागा.
घर उजळतं तेव्हा
तिच नसतं भान
विझून गेली अंधारात की
सैरावैरा धावायलाही
कमी पडतं रान !"
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.🙏🏻
खूपच छान लेख सर 👌👌
ReplyDeleteगुरूदेव खूपच सुंदर लेख....👍👍👌👌
ReplyDelete- निलेश जाधव
हिंदी विभाग
श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय, कापशी
सर खूप छान लेख
ReplyDeleteअप्रतिम सर....
ReplyDeleteखूप छान लेख सर
ReplyDeleteKhup chhan ....aani aabyaspurn mandani...
ReplyDeleteखूप छान व अभ्यासू लेख,👍👍
ReplyDeleteखूप सुंदर शब्दात संस्थामाता यांचा जीवनपट मांडला आहे.
ReplyDeleteअभिनंदन सर
The best sir. Great initiative.
ReplyDeleteभावस्पर्शी लेखन सर...
ReplyDeleteबालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली / अतिशय सुंदर लेखन...
ReplyDeleteअप्रतिम विचार सर
ReplyDeleteसुंदर लेख 👌
ReplyDeleteखुप छान लिहिलंय सर...
ReplyDeleteखुप छान लिहिलंय सर
ReplyDeleteअतिसुंदर
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे.अभिनंदन सर
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअप्रतिम मांडणी केली आहे सर
ReplyDeleteखूप छान लेख..👌
ReplyDeleteजेव्हा ज्ञानाला भावनेची जोड मिळते तेव्हा लेखणीतून काही आविष्कार घडतात आणि हा लेख त्या आविष्कारांपैकीच एक... अप्रतिम 👌
ReplyDeleteखूप छान सर....
ReplyDeleteखूप सुंदर...👌👌
ReplyDeleteसुंदर लेख सुंदर मांडणी
ReplyDeleteछान लेख
ReplyDeleteVery nice article
ReplyDeleteखूप सुंदर आणि भावनाप्रधान लेख सर,
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete