Wednesday, 8 June 2022

‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि वारकरी संप्रदाय : एक अनुबंध’


‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि वारकरी संप्रदाय : एक अनुबंध’

          प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड

          प्र प्राचार्य, 

          शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

सत्वशील समाजनिर्मितीसाठी सात्विक विचारांची गरज असते. समाज, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान साहित्य आणि शिक्षण या साऱ्यांमध्ये एक अंत:शृंखला असते, एक अनुबंध असतो. संस्कृती. धर्म. तत्त्वज्ञान आणि या तीनही गोष्टी ज्या माध्यमातून आविष्कृत होतात संक्रमित होतात ते साहित्य आणि शिक्षण, या साऱ्यातून समाज घडत असतो. समाज सत्वशील घडवायचा असेल तर समाजाची संस्कृती आणि धर्म सत्वशील असला पाहिजे त्या संस्कृतीचे आणि धर्माचे तत्त्वज्ञानही सत्वशील असायला हवे. या सत्वशीलतेतूनच सुसंस्कार घडत असतो.

मग सत्त्वशीलता म्हणजे काय ? सत्वशील असण्याची नेमकी परिभाषा काय ? ही परिभाषा खरेतर प्रत्येक धर्माने प्रत्येक पंथाने आणि प्रत्येक संप्रदायाने आपणाला दिली आहे. ती त्यांच्या त्यांच्या काळाप्रमाणे संस्कृतीप्रमाणे विचाराप्रमाणे आहे. ती थोडी थोडी भिन्नही आहे, पण तरीही खूपशी समान आहे. या साऱ्या धर्म पंथ संप्रदायातील सद्विचारांचा किमान समान एक विचारांचा धागा काढला तरी असे आढळेल की हे एक समान सूत्र आहे, आणि हे सूत्र म्हणजे मानवी मूल्य, मानवतावाद !

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा या सर्व धर्मांचा व धर्मांच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास होता. विशेषतः वारकरी संप्रदाय आणि त्याचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केलेले होते. म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या संस्थेच्या प्रार्थनेत मानवतावाद म्हणजे काय आणि मानवतावादी समाज म्हणजे नेमके काय याची अचूक व्याख्या दिली आहे ते म्हणतात. 

    सत्यशील प्रामाणिकता त्याग पिळवणुकीस आळा

    मानव्याचे अधिष्ठान इशतत्त्वदर्शन

   त्यांचे ज्ञान नी विज्ञान हाच सुसंस्कार

   विवेकाच्या आनंदाचा लाभ शिक्षणात।।

मला वाटते माणसाला माणूस बनवणारे आणि मानव्याचे अधिष्ठान असणारे हे तत्त्वज्ञान बापूजींनी सांगितले आहे. मानवतेचा पाया असणारी ही तत्त्वे बापूजींनी प्रार्थनेत कोठून घेतली हेही त्यांनी याच प्रार्थनेत सांगितले आहे. ते म्हणतात

राम कृष्ण रहीम ख्रिस्त बुद्ध झरथुष्ट्र

महावीर मानव संत मानव्याचे दीपस्तंभ

लीनदीन होऊनी त्याचे वंदुया चरण

हे मानव्याचे म्हणजेच मानवतेचे दीपस्तंभ आहेत. यातील प्रत्येक महामानवाच्या चरित्रातून याच मानवतावादी मुल्यांचा उद्घोष होत आहे. बापजींनी दिलेली ही प्रार्थना केवळ ईश्वराची प्रार्थना नाही, तर ती ‘ईशतत्त्वाची आराधना’ आहे. सर्व धर्मातील अंतिम सत्याला कवेत घेण्याचा तो एक प्रयत्न आहे. सर्व धर्मांना स्वतःत सामावून घेऊन, सर्व धर्मांच्या पलीकडील मानवतेला साद घालणारी आर्तता म्हणजे ही प्रार्थना आहे. राम-कृष्णांचे ‘उदार वैश्विक हिंदुत्व’,  गौतम बुद्धांनी मानवतेच्या कल्याणाकरिता दिलेली ‘पंचशील तत्वे’, येशू ख्रिस्ताने दिलेली ‘करुणा’, पैगंबराने शिकवलेली ‘बंधुता’, झरथुष्ट्राने शिकवलेल्या ‘ज्ञानरुपी अग्नीची उपासना’, महावीरांनी सांगितलेले ‘अहिंसा, सत्य,अस्तेय’ आणि महात्मा गांधींनी दिलेला ‘सत्यमेव जयते’ हा महामंत्र या पायावरच बापूजींच्या प्रार्थनेतील आणि तत्वज्ञानातील “सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा” ही ‘पंचशील’  उभी आहेत. सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा ही पंचशील तत्त्वे तर बापूजींचे नाते थेट बुद्धाशी जोडतात. समाजातील माणसात बदल घडवून, त्याला मानवतेचा उपासक बनवून त्यातून समाज घडवणाऱ्या बापूजींना अपेक्षित असणाऱ्या मानवतेची ही परीभाषा आहे. 

बापूजींच्या जीवनकार्याचा पाया हा ‘सर्वे सुखिना सन्तु । सर्वे सन्तु निरामया ।।’ हाच होता. समाजातील सर्व लोकांनी सुखी असावे, आनंदी असावे याकरता त्यांची तळमळ होती. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत, भूमिगत चळवळीत आणि महात्मा गांधींच्या अहिंसात्मक आंदोलनात सहभागी होण्यामागची त्यांची हीच भूमिका होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिळालेल्या स्वराज्याला सुराज्यात बदलायाचे असेल, देश सुजलाम सुफलाम बनवायचा असेल तर शिक्षणापासून वंचित, दुर्लक्षित समाज शिक्षणाच्या छत्राखाली आणला पाहिजे, असे त्याना मनोमन वाटत होते म्हणून त्यांनी  आपल्या कार्यासाठी शिक्षण क्षेत्र निवडले. ‘अवघे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।।’ हीच त्यांची समाजाकडे पाहण्याची भावना होती. 

संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला दिशा देणारे आणि समाजाला उन्नत करणारे कार्य कोणते असेल, तर ते शिक्षणप्रसाराचे. हे कार्य त्यांनी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन करून सुरु केले. या त्यांच्या कार्याचा पाया आणि यशस्वितेचे गमक म्हणजे त्यांची धार्मिक वृत्ती, सात्विक आचरण, मानवतावादी विचार हाच आहे ! बापूजींच्या विचार, आचार, तत्त्वज्ञान यांचा पाया म्हणजे श्रीमद्भागवत गीता, ज्ञानेश्वरी, गाथा व वारकरी संप्रदायातील संतांचे तत्त्वज्ञान होते. बापूजींचे तत्त्वज्ञान आणि वारकरी संप्रदाय यांचा अनुबंध आपण समजून घेतला पाहिजे.   

महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीचा आणि संस्कारांचा गुणच असा आहे की इथल्या संतांनी विरांच्या मनातील वीरश्री जागी केली आहे, आणि विरांनीही संतांनी दाखवलेल्या सदाचाराच्या आणि सद्वर्तनाच्या मार्गाने वाटचाल केली आहे. समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण या सर्वांना एकत्र घेत वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय ! या संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला आणि त्याचा कळस होण्याचा मान संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराजांना मिळाला. ही केवळ कवीकल्पना नाही तर या सर्व संतांचे कर्तृत्वच एवढे श्रेष्ठ आहे की, आजही महाराष्ट्र या संतांच्या मार्गदर्शनावर आपली वाटचाल करतो आहे. बदलत्या काळावर विजय मिळवून आजच्या काळालाही सुसंगत असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान या संत साहित्यात आहे. बापूजींनीही याच मार्गाने आयुष्यभर वाटचाल केली. 

बापूजींचे स्नेही आणि मार्गदर्शक असणाऱ्या स्वामी रामानंद भारती यांचे संस्थेच्या आणि बापूजींच्या जीवनात मोलाचे स्थान आहे. संस्थेच्या सुरुवातीला संस्थेला ‘संत शिक्षण संस्था’ असे नाव द्यावे असा विचार बापूजींचा होता. परंतु स्वामी रामानंद भारती यांनी बापूजींना सांगितले की, संस्थेने स्वामी विवेकानंदांच्या शैक्षणिक विचारावर काम करावे असे मला वाटते. त्यावरूनच स्फूर्ती घेऊन बापुजींनी संस्थेचे नाव ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था’ ठेवले. बापूजीनी स्वामी रामानंद भारती यांची त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा केली. त्याच्याबद्दलच्या नितांत आदरातून बापूजीनी तासगावच्या शाळेला स्वामी रामानंद भारती यांचे नाव दिले. 

सात्विकता हा बापुजींच्या व्यक्तिमत्वाचा विशेष गुण होता. बापुजींच्या स्वभावातील संतत्व दाखवणारी खुण म्हणजे त्यांच्या मनात गोर-गरीब मुलांच्या बद्दल असणारी कणव आणि प्रचंड कळवळा. या गरीब अनाथ मुलांचे बापूजी आई-वडील होऊन जायचे. संपूर्ण महाराष्ट्रातून वाड्या-वस्तीवरून होस्टेलला आलेल्या मुलाची ते जीवापाड काळजी घ्यायचे. 

‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ।

तोची साधू ओळखावा I देव तेथेची जाणावा ।।’

दिवाळीच्या सणाला घरातील मुलांना जे गोड-धोड केले जायचे तेच या मुलांसाठी दिले जायचे. आई वडील नसलेल्या या मुलांना समोर बसवून आंघोळ घालताना संस्थामाता सुशीलादेवी आणि बापूजींना कधी परकेपणा वाटला नाही. या होस्टेल मधील मुलांच्यात दलित मुले होती, आदिवासी होती, अनाथ मुले होती. हे वाचले की, संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले साधुत्त्वाचे आणि देवत्त्वाचे लक्षण आठवते, या संतत्वाचा चालता-बोलता अविष्कार म्हणजे बापुजींचे जीवन होते. “येथे कुल जातीवर्ण । अवघे चि गा अकारण ।।” असे मानून  सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बापुजींनी केला केला. त्यांनी आपल्या आयुष्यात जात, धर्म, पंथ असले कोणतेही भेद मानले नाहीत. सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना पोटच्या लेकराप्रमाणे हृदयाशी धरले. मानवता हाच बापूजींचा धर्म होता !    

वारकरी संतांवर बापूजीचा इतका प्रगाढ विश्वास होता की कोणत्याही सत्तेपुढे आणि धनदांडग्यापुढे कधीही न वाकणारे बापुजी संतांच्यासमोर नतमस्तक असायचे. बापूजींचा स्वाभाविक ओढा हा नेहमीच वारकरी संप्रदायातील संतांकडे होता. बापूजी ज्या ज्या वेळी पंढरपूरला जायचे, त्या त्या वेळी ते आवर्जून दादामहाराज मनमाडकर यांना भेटायला जायचे.कैकाडी महाराजांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. 

संताचिये पायी हा माझा विश्वास ।

सर्वभावे दास झालो त्यांचा ।।

ही त्यांची भावना असायची. संस्थेचे एक विभागीय शिबीर त्यांनी पंढरपूरला संत गाडगेबाबांचे परमशिष्य शिंदे महाराजांच्या मठात घेतले होते. या वेळी बापूजींनी पंढरपुरातील वारकरी परंपरेतील सर्व लोकाना या अधिवेशनासाठी निमंत्रित केले होते. वारकरी परंपरेचे वारसदार असणाऱ्या आणि संत गाडगेबाबांचे सच्चे पाईक असणाऱ्या शिंदे महाराजांचा बापूजींशी आंतरिक स्नेह होता. त्यांनीच सर्वात प्रथम बापूजींचा उल्लेख ‘शिक्षणातील महर्षी’ असा केला होता, आणि तोही सातारा येथील श्री भवानी विद्यामंदिर येथे झालेल्या शिबिरात केला होता, त्याचेच पुढे रुपांतर बापूजींच्या ‘शिक्षणमहर्षी’ उपाधीत झाले 

महाराष्ट्र शासनाने व्यसनमुक्ती अभियानासाठी सन्मानित केलेले आणि दिल्लीत घेतलेल्या ज्यांच्या पारायणाला स्वतः इंदिरा गांधी येऊन बसल्या होत्या असे हरी भक्ती परायण पुंडलिक महाराज वेळूकर यांनी संस्थेवर बापूजींवर आणि बापुजींच्या विचारावर आयुष्यभर नितांत प्रेम केले. आपल्या गावात शाळा असली पाहिजे आणि ती बापूजींच्याच संस्थेची असली पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. आणि संस्थेचे एक संस्कृती केंद्र सातारा जिल्ह्यातील वेळू या गावात सुरु झाले. 

पाचगणीचे दत्तात्रय महाराज कळंबे यांचे आणि बापूजींचे आत्मीय नाते होते. कळंबे महाराजांनाही गोरगरीब जनतेबद्दल कळवळा होता, या समान विचारातून ते एकत्र आले, आणि त्यांचे स्नेहबंध तयार झाले. पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणाला भारतातील शैक्षणिक केंद्र म्हणतात. पण हे शिक्षण फक्त गर्भश्रीमंतांच्याच मुलांना उपलब्ध होते. तिथल्या सामान्य जनतेला हे शिक्षण परवडणारे नव्हते. म्हणून कळंबे महाराजांना पाचगणीत शाळा सुरु करायची होती, पण ती शाळा फक्त बापूजींचीच असली पाहिजे, या हट्टाने त्यांनी बापूजीना तिथे शाळा सुरु करण्यासाठी मदत केली. आज तेथे संस्थेचे हायस्कूल आणि कॉलेज दोन्ही सुरु आहेत.

बापूजींचे व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाशी जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे, बापूजींचे संगीत प्रेम ! बापुजी स्वतः उत्तम हार्मोनिअम वाजवत होते. त्यांचा आवाज फार गोड होता. ते भजने खूप गोड आवाजात गात असत. होस्टेलच्या पाचवीपासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना एकत्र करून ते भजने गाऊन दाखवत, त्यांचा अर्थ सांगत. एखादी ओवी, एखादा अभंग घेऊन त्याचे निरुपण करीत. संस्थेच्या कामाने, व्यापाने किंवा ताण-तणावाने कधी जर बापुजी अस्वस्थ असले तर घरी आल्यावर शांतपणे ते आपले हार्मोनिअम काढत आणि आपल्या सुरेल आवाजात भजने गायला सुरुवात करत. भजनाच्या त्या सात्विक अर्थात आणि गोड सुरावटीत आपली सारी दु:खे, सारा त्रास, सारा ताण-तणाव विसरून जात. संस्थेची प्रार्थना म्हणजे बापूजींच्या आध्यात्मिक विचारसरणीचा परिपाक आहे.

आर्थिक चारित्र्य आणि आर्थिक नितीमत्ता हा बापुजींच्या आग्रहाचा विषय होता. संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये त्यांनी साधेपणा आणि काटकसर याचा आग्रह धरला आहे.

जोडोनिया धन उत्तम व्येवहारे । उदास विचारे वेच करी ।

उत्तमची गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखणी ।।   

या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे संस्था समाजाच्या पैशातून उभी राहते, अशा वेळी संस्थेच्या शाखांचे हिशोब सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्याचेही आश्वासन त्यांनी आपल्या उद्दिष्टांमध्ये दिले आहे. एका आदर्श सामाजिक संस्थेला मार्गदर्शक ठरावीत अशी ही उद्दिष्टे आजही संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरत आहेत.

बापूजी नेहमी विचार, आचार आणि उच्चार यांच्या यांच्या शुद्धतेचा आग्रह धरीत असत. शुद्ध, सात्विक, निर्मळ जीवन जगण्याबाबत बापूजींचा आग्रह असे. 

नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।।

तैसे चित्त शुद्धी नाही । तेथे बोध करी काई ।।

स्वतः बापूजीही त्याचे काटेकोरपणे पालन करीत. आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते नेहमी सांगत की, तुम्ही ‘ससंसुंम’ यांपासून दूर राहिले पाहिजे. ‘ससंसुंम’ म्हणजे सत्ता, संपती, सुंदरी आणि मदिरा या दुर्गुणांपासून शिक्षकाने कायम दूर राहिले पाहिजे. बापूजींच्या या तत्त्वज्ञानावरुनच लक्षात येते की, बापूजींचा पिंडच आध्यात्मिक प्रवृत्तीचा होता.          

     आज महाराष्ट्र ज्या शिक्षणप्रसाराची सुमधूर फळे चाखीत आहे, त्या शिक्षणप्रसाराचा वृक्ष ज्या महामानवांनी लावला, त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे. या फळांनी लगडलेल्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत बसताना आणि त्या वृक्षाच्या सुमधुर फळांचा आस्वाद घेताना, त्या वृक्षाच्या वाढीसाठी कोणत्यातरी एका बीजाने स्वतःला जमिनीत गाडून घेतले आहे. हे आपण विसरता कामा नये. स्वतःला जमिनीत गाडून घेणाऱ्या बिजाप्रती आपण नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे. म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या, जिथे कोणत्याही सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत अशा ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाणाऱ्या आणि  हजारो गुरुदेव कार्यकर्त्यांची कुटुंबे सुखी समाधानी आणि आनंदी करणाऱ्या ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’चे संकल्पक, संस्थापक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागाचे, परिश्रमाचे आणि कठोर ध्येयनिष्ठध्येयनिष्ठेचे आपण कृतज्ञतेनेस्मरण करणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणप्रसाराच्या इतिहासात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या योगदानाची दखल उभ्या महाराष्ट्राने घेतली आहे. कर्मवीरांच्यानंतर त्याच प्रेरणेने आणि झपाटलेपनाने उभा महाराष्ट्र पिंजून काढीत महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचत,  शिक्षणप्रसाराचा हा ज्ञानयज्ञ अखंडपणे तेवत ठेवण्याचे कार्य बापूजींनी केले आहे. म्हणूनच या महामानवाच्या त्यागाला वंदन करून त्यांच्या पायी नतमस्तक होणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. 


2 comments:

  1. महेश , फार छान लिहिलं आहे . बापूजींचे कार्य मोठे आहे . ते सर्व लोकांना अद्याप माहीत झालेले नाही.
    तुम्ही यावर उत्तम पुस्तक लिहावे अशी नम्र सूचना !

    ReplyDelete
  2. सर तुमच्या लेखावर प्रतिक्रिया देण्याइतपत निश्चितच मी मोठी नाही.. फार सुंदर. हा लेख वाचल्यानंतर बापूजींचा एक वेगळा पैलू समजला.
    तुमच्या लेखणीतून असेच मार्गदर्शन होत रहावे.
    प्रा. शोभा लोहार( शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड)

    ReplyDelete