"संगीताला पोरके करून... 'आनंदघन' बरसून गेला"
- डॉ. महेश गायकवाड
आजचा दिवस येऊच नये असं प्रत्यक्ष काळालाही वाटले असेल, असा दिवस दुर्दैवाने आज उगवला आणि प्रत्येक भारतीयाचा स्वतःचा स्वर जणू आज अबोल झाला.
'आनंदघन' स्वर बरसून गेला
अर्थ नवा जगण्याचा सांगून गेला
लय तालालाही
स्वरताल हा देऊन गेला
सतारीला अबोल करुन
संगीताला पोरके करुन...
असीम विस्तीर्ण गांधारात
'आनंदघन' स्वर विलीन झाला
'आनंदघन' बरसून गेला....!
संगीताचे एक सुवर्णयुग संपले... प्रत्येक भारतीयाची दिदी गेली आणि संगीताची 'माऊली' गेली...!
संगीत ही भारतीय संस्कृतीने श्वासोच्छावासाइतकी जपलेली नैसर्गिक गोष्ट आहे. संपूर्ण भारतीय समाज संगीतमय झालेला समाज आहे. इथं मूल जन्माला येतं त्यावेळी कुणीतरी गात असतं आणि माणूस मरतो त्यावेळीही कुणीतरी गातच असतं. आयुष्यात एखादीतरी ओळ गुणगुणली नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. गाणं हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अशा भारतीय समाजाच्या संगीतासाठी आसुसलेल्या कानांचे कोडकौतुक पूरवण्यासाठी प्रत्यक्ष संगीताच्या देवीने अवतार घ्यावा तशी गेली जवळजवळ आठ दशके लता मंगेशकर नावाची एक गानसरस्वती संपूर्ण संगीत विश्व आपल्या मधाळ आवाजाने व्यापून टाकते आहे. कधी आईच्या मायेने जवळ घेणारा, कधी बहिणीच्या नात्याने गोंजारणारा, तर कधी प्रियकर - प्रेयसीची व्याकूळता व्यक्त करणारा आणि तेवढ्याच ताकतीने ग्यानबा - तुकोबाची संतवाणी किंवा मीरेच्या भजनातील आर्तता दाखवणारा हा आवाज आता आमचा मानसिक आधार बनला आहे!
प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आपला वाटणारा आणि वाढलेल्या वयाचा कोणताही मागमूस नसलेला तो आवाज शेवटपर्यंत तसाच गोड होता.
मराठी रंगभूमीवरील प्रसिध्द गायक, लतादीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या समृध्द गायकीचा वारसा त्यांना जन्माने मिळाला. लहानपणी अंगणात खेळत असलेल्या लताने, चुकीच्या पध्दतीने गात असलेल्या दीनानाथांच्या विद्यार्थ्याला पळत घरात जाऊन ‘पूरिया धनाश्री' राग बरोबर गाऊन दाखवण्यास सुरुवात केली. वडील दीनानाथांनी ते ऐकले आणि लताचे संगीत गुण आणि समज त्यांनी ओळखली त्या दिवसापासून लतांची संगीताची शिकवणी सुरु झाली . निसर्गाने दिलेल्या ईश्वरी आवाजाबरोबरच लतादीदींनी कठोर परीश्रम आणि अखंड रियाज करीत अनेक गुरुंकडून ज्ञान मिळवीत या आवाजाला पैलू पाडले.
वयाच्या तेराव्या वर्षी चित्रपटातील पार्श्वगायनाची सुरुवात केल्यापासून आजपर्यंतची त्यांची गाणी म्हणजे चित्रपट सृष्टीचा इतिहास आहे. जगभरातल्या जवळजवळ बावीस भाषातून त्यांनी गाणी गायली आहेत आणि ही प्रत्येक भाषा आत्मसात करण्यासाठी कष्ट केलेले आहेत. निव्वळ हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषांच्या उच्चारावर प्रभूत्व मिळवण्यासाठी त्यांनी आयुष्यातले कित्येक तास आणि दिवस खर्ची घातले आहेत.
१९४७ साली भारताच्या स्वातंत्र्याबरोबर लतादीदींची संगीतमय कारकिर्द बहरु लागली होती. अनिल विश्वास, सी. रामचंद्र , रोशनलाल , मदनमोहन यांसारख्या जुन्या संगीतकारांपासून ते अलीकडच्या राम - लक्ष्मण, जतीन-ललीत, ए.आर रहमान पर्यंतच्या संगीतकारांच्या अनेक पीढ्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. रफी, मुकेश, किशोरकुमार, मन्ना डे, हेमंतकुमार, गीता दत्त, शमशाद बेगम, आशा भोसले यांसारख्या गायक - गायिकांबरोबर अनेक अविस्मरणीय गाणी गायली आहेत 'आयेगा आनेवाला' पासून ते अगदी 'दीदी तेरा देवर दिवाना' पर्यत अनेक हिंदी गाणी रसिकांच्या ओठावर खेळत असतात आणि मराठीत त्यांनी गायिलेली हजारो गाणी हा तर मराठी माणसासाठी अमूल्य ठेवाच आहे .
'या चिमण्यांनो परत फिरारे', 'मालवून टाक दीप', 'श्रावणात घन निळा बरसला' ही गाणी किंवा ज्ञानदेवांची अभंगवाणी असणारी ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा', 'आजी सोनीयाचा दिनू' अशी गाणी असोत किंवा 'खुलवीते मेंदी माझा रंग गोरापाण, ' किंवा 'किती जीवाला राखायचं' अशी लावण्याची खाण असणारी मराठी लावणी असो किंवा अंगावर रोमाचं उभे करणारे ‘जयोस्तुते श्री महन्मंगले' असो किंवा स्वत: लतादीदींनी 'आनंदघन' नावाने स्वरसाज चढवलेले 'ऐरणीच्या देवा' किंवा 'बाई बाई मनमोराचा' असो. आठवायला बसलं तर दीदींची हजारो मराठी, हिंदी गाणी भोवताली फेर धरु लागतात. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा नुसता आढावा घ्यायचा म्हटलं तर त्यावर एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल!
पण हे लिहीताना माझी भूमीका अभ्यासकाची नाहीच. संगीत तज्ज्ञाची तर नाहीच नाही. ती भूमीका आहे संगीत देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या अजाण पण भावीक वारकऱ्याची, आध्यात्म कळो ना कळो वारकऱ्याला जशी परब्रम्हाच्या दर्शनाची ओढ असते तशी लतादिदींच्या आवाजाची आणि गाण्याची एक अनावर ओढ मनात कायम जाणवत असते!
लतादीदींनी गायलेली भक्ती गीते ऐकताना किंवा 'ज्योती कलश छलके' सारखं रागदारीवर आधारीत गाणं ऐकताना वाटतं. प्रत्यक्ष भगवंतांनीच तीच्या गळ्यात बासरीचे सुर ओतले असावेत. त्यामुळे त्या गळ्यातून निघणारा 'गांधार' ईश्वरीच असणार! आणि हा आवाज ऐकणं यापेक्षा ईश्वराच्या अस्तित्वाची वेगळी प्रचिती ती काय असणार! लता दीदींनीही आपले गायन एखाद्या तपश्चर्येप्रमाणे जपले होते, वाढवले होते. दीदी ज्यावेळी जगात कुठेही रंगमंचावर गाणे गाण्यासाठी येत असत, त्यावेळी पायात चपला घालीत नसत आणि त्यांच्या आगमनाबरोबर समोरचा हजारोंचा श्रोतृवर्ग मग तो भारतातला असो वा परदेशातला, मंत्रमुग्ध होवून आपोआप उभा राहत असे!
आजपर्यंत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. फिल्मफेअर पुरस्कार तर शेवटी नवीन गायीकांना संधी मिळावी म्हणून स्वीकारायचा बंद केला. दादासाहेब फाळके पुरस्कारांपासून ते 'भारतरत्न' पर्यत शेकडो पुरस्कार मिळवूनही त्या मात्र आजपर्यत लता मंगेशकर'च राहिल्या! आणि त्यामुळेच आज लता मंगेशकर' हीच या संगीत क्षेत्रातली सर्वोच्च पदवी झाली आहे!
लतादीदींचे गाणे हा विषय संगीताची आवड असणाऱ्या कोणत्याही माणसाला बोलताना कधीही कंटाळा न येणारा आणि कितीही बोलले तरी बोलून न संपणारा विषय! पण सुगंध हा जसा अनुभवायचा विषय आहे तसे लतादीदींचे गाणे हा अनुभवायचा विषय आहे . म्हणून दीदींच्या गाण्यांचे स्वर दिवसातील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक प्रसंगी मनात रुंजी घालत असतात.
मानवी जीवनातील असा कोणताही प्रसंग नाही ज्यासाठी दिदींनी गाणं गायलेलं नाही. अशी कोणतीही मानवी भावना नाही, जी त्यांच्या गाण्यातून व्यक्त झालेली नाही. म्हणून तर लतादीदींचा स्वर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. जोपर्यंत मानवाच्या मनात भावना जिवंत आहेत तोपर्यंत हा स्वर, हा आवाज असाच अजर, अमर चिरतरुण राहील... जगण्याचे बळ देत राहील...!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteसमर्पक शब्दात, लता दीदींच्या गायनाचा आढावा.योग्य शब्दांजली.
ReplyDeleteअतिशय उत्तम, थोडक्यात
ReplyDelete🙏भाव आणि शब्द यांचा सुरेख संगम. सुंदर शब्दसुमनांजली.
ReplyDeleteभावपूर्ण शब्दांजली महेश सर
ReplyDeleteखूप छान गायकवाड सर ,लता दिदींच्या जाण्याने संगीताच्या एका युगाचा अंत झाला आहे
ReplyDeleteExcellent!!!!
ReplyDeleteगाणसम्रांज्ञी लता दिदींची समर्पक शब्दात केलेली मांडणी मनाला भावनारी भाषा शैली, भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDeleteShort and Excellent article Sir
ReplyDeleteसर अप्रतिम ,लिहल आहे आपण, आपले अभिनंदन
ReplyDeleteसुंदर लिहिलंय. लतादीदी भरतावर्षासाठी पडलेले गोड स्वप्न.
ReplyDeleteसर,अप्रतिम लिहल आहे आपण, आपल्या लेखनास शुभेच्छा
ReplyDeleteखुप आतून आलेले, मनःपूत लिहीलेले शब्द ! आम्हा सर्वांची भावना उत्तम शब्दबद्ध केलेत .
ReplyDeleteशब्द सुमनातून आदरांजली
ReplyDeleteखूपच छान शब्दांची मांडणी सर्वांच्या भावना आपणा मार्फत पोहोचल्या
ReplyDeleteगान तपस्विनी चा अद्भुत जीवनालेख तितक्याच दिव्य., अजोड, हृदय स्पर्शी तरल भावपूर्ण शब्दात. ��������������
ReplyDeleteसुरेखा शिंदे
अप्रतिम लेखन.....
ReplyDeleteभाऊ आपले लिखाण मना मनाला स्पर्श करणारे आहे सर्वांच्या ह्रदय चोरणारे आहे,,खूप शुभेच्छा भाऊ
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteदीदींच्यासाठी समर्पक शब्दांजली..!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletekhup chan sir🙏🙏
ReplyDeleteगायकवाड सर अतिशय समर्पक शबदात आणि उत्तम भाषा शैली वापरुन आपण गान सम्राग्नि लता मंगेशकर यानां अतिशय भावपूर्ण श्रधान्जली अर्पण केली आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteअप्रतिम लेखन....
ReplyDeleteगायकवाड सर अतिशय अप्रतिम लेख अतिशय समर्पक शब्दांमध्ये आपण लतादीदींच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे आहे व त्यांच्या कार्याची ओळख ओळख अतिशय कमी शब्दांमध्ये करून दिलेली आहे
ReplyDeleteधन्यवाद सर
A very good tribute to the greatest singer.
ReplyDeleteलता मंगेशकर यांच्या जडणघडणीची समर्पक शब्दात मांडणी.सुंदर लेख,सर.
ReplyDelete